आज जागतिक पुस्तक दिन
वाचन संस्कृतीपेक्षा खर्रा संस्कृती बळावतेय
वाचनालय कमी ,पानठेले जास्त
मूल :- विनायक रेकलवार
वाचाल तर वाचाल.वाचन हे मनाचे अन्न आहे.हे अन्न आज कमी होत चालले आहे.गावात वाचनालये नाहीत.त्यामुळे वाचन संस्कृती कमी चालली आहे.त्याऐवजी खर्रा संस्कृती मोठया प्रमाणावर बळावत चालली आहे.वाचनालय कमी आणि पानठेले जास्त अशी अवस्था निर्माण झाली आहे.विदयार्थ्यांसह युवकांमध्ये आणि महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक गावात एक तरी वाचनालय निर्माण झाले पाहिजे.आजच्या घडीला गावातील वाचनालयाची अवस्था मोडकळीस आली आहे.स्थानिक मूल मध्ये याआधी कर्मवीर महाविदयालय,मूल नगर पालिकेचे वाचनालय होते.दोन्ही वाचनालय मध्ये वाचकांची संख्या भरभरून राहत होती.वेगवेगळे वृत्तपत्र आणि विविध लेखकांची वेगवेगळया साहित्याची पुस्तके उपलब्ध राहत होती.आज दोन्ही वाचलालये वेगवेगळया कारणामुळे बंद झाली.त्यामुळे रसिक आणि दर्दी वाचकांची मोठी यानिमित्ताने गोची झाली.आजच्या घडीला मूल मध्ये शाळा महाविदयालयातील वाचनालये सोडल्यास शामा प्रसाद मुखर्जी वाचनालय आणि एल्गार प्रतिष्ठान वाचनालय तेवढे उपलब्ध आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विदयार्थीच तेवढे त्या वाचनालयात दिसतात. पंचवीस हजारच्या वर लोकसंख्या असलेल्या गावात शासकीय वाचनालय नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावे लागेल.
वाचनालय ऐवजी पानठेले जास्त :- ग्रामिण भागात आणि शहरी भागात वाचनालनय कमी आणि पानठेले जास्त दिसतात.वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे.त्यासाठी गावागावात वाचनालये निर्माण झाली पाहिजे.त्यासाठी शासन सुदधा प्रयत्न करीत नाही.लेखकांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी आणि वेगवेगळे साहित्य वाचकांच्या मनापर्यंत जाण्यासाठी दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी संमेलन भरवले जाते.हा तीन दिवसांचा मेळावा तेवढा सोडला तर,बाकी संघाच्या वतीने वाचकासाठी प्रत्येक गावात संमेलने,साहित्य मेळावे,भरविण्याचे साधे औचित्य सुदधा दाखविले जात नाही.त्यामुळे पुस्तकांची माहिती सुदधा वाचकांना माहित नसते.
वाचनालय इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत :- मूल नगर पालिकेने आपल्या हद्यीतील एका मोकळया जागेत भर वस्तीत एका विशेष अनुदानातून वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले.ती इमारत आता उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. या वास्तूत वाचनालय सुरू झाल्यास वाचकासाठी तो दिवस आनंदाचा असेल.परंतु नगर पालिका प्रशासन वाचकांच्या आनंदावर विरजन घालीत आहे. हे वाचनालय लवकर सुरू व्हावे ,अशी वाचकांची मागणी आहे.
सोशल मिडीयाचा परिणाम :- सोशल मिडीयावरील व्हॉटस अॅप,यु टयुब आणि फेसबुक मुळे वाचनाची आवड कमी होत असल्याचा आरोप होत आहे.सोशल मिडीयावरील माहितीमुळे खरे अन्न बाजूला राहत नसल्याने येथील साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
युवकांचा कल खर्रा कडे :- वाचना पेक्षा विदयार्थ्यांसह युवकांचा कल खर्रा खाण्याकडे जास्त निर्माण झाला आहे.खर्रा संस्कृती जास्त बळावत चालल्यामुळे मनाच्या अन्ना ऐवजी शरीराचे मोठे नुकसान होत असताना दिसत आहे.त्यासाठी शासन आणि प्रशासनाने जागतिक पुस्तक दिनी मोठी निर्धार करून प्रत्येक गावात सुसज्ज आणि सर्व सोयी निशी वेगवेगळया साहित्यासह एका वाचनालयाची निर्मिती करावी अशी मागणी होत आहे.