प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख
जन्म एका सुधारकाचा
महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक, लेखक, पत्रकार, इतिहासकार, नाटककार, तबलावादक आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे समाजाला प्रबोधन करणारे म्हणजेच *प्रबोधनकार* म्हणून सारा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो आहे. त्यांचे नाव आहे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे.
कोणत्याही व्यक्तीच्या जीवन आणि कार्याचा अभ्यास करीत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली हे जाणून घेणे अगत्याचे असते. समाजातील थोर व्यक्तीचे ज्यावेळी अशा दृष्टिकोनातून अध्ययन केले जाते त्यावेळी असे दिसून येते की काही थोर व्यक्ती जन्मताच थोर असतात तर काही थोर व्यक्ती स्वतःच्या कर्तुत्वाने व अंगच्या गुणांनी थोर म्हणून उदयास येतात. अशातीलच महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व असलेले केशव सिताराम ठाकरे यांना महाराष्ट्र प्रबोधनकार या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म दिनांक 17 सप्टेंबर 1885 रोजी पनवेल येथे झाला. कठीण परिस्थितीवर मात करून घरातील संस्काराचा वारसा आणि शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे केशव चा पिंड अधिक कसदार आणि पीळदार बनत गेला. त्यांच्या कामात जिद्द आणि चिकाटी होती ते आयुष्यात कधी थकले नाहीत, आणि त्रासले नाही. त्यांच्या कार्याने व कर्तुत्वाने ते केशवराव ठाकरेचे महाराष्ट्राचे प्रबोधनकार ठाकरे म्हणून प्रसिद्ध झाले.
प्रबोधनकारांना अफाट ज्ञान होते. सुधारणा घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांना स्वतःचे जिवंत अस्तित्व असणारे मनातील भावभावना व्यक्त करून समाजाला जागृत करणारे पाक्षिक काढावे असे सतत वाटत होते. त्यासाठी प्रबोधनकारांनी विद्यार्थी दशेतच खटाटोप केले परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आपल्या प्रयत्नाला यश आले नाही, म्हणून त्यांनी जिद्द सोडली नाही. काही दिवसानंतर केशव सिताराम ठाकरेंनी 16 ऑक्टोबर 1921 रोजी *प्रबोधन* नावाचे पाक्षिक सुरू केले. हे पक्षिक पहिल्यांदा दादर मुंबई येथे सुरू केले. प्रबोधन हे पाक्षिक नावाप्रमाणे प्रबोधन करणारे होते. म्हणून त्यांना प्रबोधनकार हे नाव पडले वाचकाला कृती प्रवण करण्याची ताकद त्यात होती. सुधारणा घडवून आणण्याचे विचार प्रबोधन पक्षिकात प्रकाशित होत होते. प्रबोधनकारांचे विचार कडवे होते, त्यांना सामाजिक सुधारणा हव्या होत्या म्हणून त्यांनी आपले रोखठोक विचार पक्षिकात मांडण्याचे धाडस केले. परिस्थितीनुसार प्रबोधन हे वृत्तपत्र कधी कधी मासिक कधी साप्ताहिक म्हणून चालविले.
प्रबोधनकारांच्या बालपणात घरातील परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती. ते घर सोडून मित्रांबरोबर खेळायला कधी गेले नाही, ते आजोबांचे अत्यंत लाडके होते तसेच आई-वडिलांनी देखील खूप प्रेम केले होते. बालवयातच प्रबोधनकार स्पष्ट भाषेत बोलायला शिकले ते घरातील सर्वांशी कौतुकाने बोलायचे त्यांच्यावर कधीच कोणी रागावल्याचे दिसत नाही. त्यांच्या आईने आजीने प्रबोधन करांवर फार मोलाचे संस्कार केले. त्यातूनच प्रबोधन करांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्यांना पाहिजे त्या वस्तू मिळायच्या नाही परंतु त्या मिळवण्यासाठी कधीच हट्ट केला नाही. जणू काही उपजतच त्यांनी परिस्थिती जवळून जाणून घेतली होती असे वाटते. त्यांचे पणजोबा, आजोबा-आजी, आई-वडील या तीनही पिढ्यांनी कोणती ना कोणती छोटी मोठी क्रांति केलेलीच होती. त्यापेक्षाही क्रांतिकारी प्रबोधनकारांनी व्हावे ही इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली होती.
घरातील कोणीच जातीपातीचा व स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव कधीच करीत नाहीत म्हणून बालवयात प्रबोधन करायला भेदाभेद कधीच कोणत्याही बाबतीत करायचा नाही हे कळले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यात कधीच कोणताही भेद केला नाही. याउलट भेदाभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घरातील प्रत्येक व्यक्ती ही सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात परिपक्व झालेला होता असे दिसते. तेच संस्कार प्रबोधनकरांवर झाले.
प्रबोधनकार एके ठिकाणी म्हणतात पितामह तात्यांची माझ्या चरित्र व चरित्रावर फार मोठा परिणाम झालेला आहे. घरातील बालपणापासून जसे संस्कार होईल तशीच व्यक्ती घडत असते.
अंधश्रद्धा अस्पृश्यता बालविवाह आणि हुंडाविरोधी चळवळ त्यांनी मनोमन प्रयत्नाने चालविली. त्यावर त्यांनी विपुल लेखनही केले सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही.
जीवनातील अनेक ध्येय पुढे ठेवून ते सातत्याने काम करत राहिले. त्यांना वाटत असे की प्रत्येक घरातील स्त्री सुसंस्कारित असली पाहिजे स्त्री सुशिक्षित व संस्कारित असेल तर घरातील जन्माला येणाऱ्या मुलांची जबाबदारी ती सहज सांभाळू शकते. याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात “घरातील स्त्री जर सुशिक्षित असेल तर प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित होत असते तसेच घरातील प्रत्येकावर स्त्रीच्या संस्काराने जे संस्कार केले जाते ते संपूर्ण आयुष्यच घडवीत असतात” हे सत्य आहे आपण आपल्या अनुभवातून पाहतच आहोत. प्रबोधनकरांच्या आई ह्या अतिशय बुद्धिमान व सुसंस्कारित होत्या प्रबोधनकार आपल्या आईच्या संदर्भात म्हणतात. “ठाकरे घराण्याला महाराष्ट्राच्या सामाजिक बौद्धिक आणि सार्वजनिक क्षेत्रात जी लोक मान्यता मिळाली त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रीला द्यावे लागेल.”
प्रबोधनकारांनी अनेक वेगवेगळ्या साहित्य संपादेत भर घातली उदाहरणार्थ देवळाच्या धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधन करांचे समग्र वांड:मय , प्रबोधनकार ठाकरे यांच्या जुन्या आठवणी, वक्तृत्व कला आणि साधना, संस्कृतीचा संग्राम, माझी जीवन गाथा असे अनेक लहान-मोठे पुस्तक त्यांचे प्रकाशित आहेत. प्रबोधनकारांना पुस्तके खरेदी करण्याचा आणि वाचनाचा जणू काही छंदच लागलेला होता. अनेक लोक त्यांच्याकडून पुस्तक वाचायला न्यायची आणि बरेच दिवस झाले म्हणजे परत यायचीच नाही अशावेळी प्रबोधन करांनी वर्तमानपत्रात एक बातमी दिली की ज्यांनी कोणी वाचनाकरिता पुस्तकं नेलेली आहेत त्यांनी कृपया माझ्या पत्त्यावर आणून द्यावीत.
प्रबोधनकारांचे जीवनातील अखेरचा आणि अटीतटीचा संघर्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा होय प्रबोधनकारांणे आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण कार्य केली. असली तरी राष्ट्रीय कार्य म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठ्या उत्साहाने कार्य तत्पर झाले होते. त्यांचे वय वाढले असले तरी त्यांनी उत्तम प्रकारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला नेतृत्व दिले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा प्रबोधन करांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता आयुष्यभर संघर्ष करीत राहिल्याने त्यांचे शरीर थकले होते. धावपळ अशक्यप्राय होती. तशाही प्रतिकूल स्थितीत प्रबोधन कारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले. या चळवळीला दिलेले त्यांची योगदान इतर कोणापेक्षाही कमी नव्हते.
अशा महान व्यक्तिमत्त्वाचा आज जन्मदिवस…….!!
विनम्र अभिवादन.
लेखक
डॉ धर्मा वा. गावंडे
9421720676