आजन्म खादीचा वापर करणारे दादा

139
 दादा
दादा. एक वजनदार शब्द. दादा म्हणजे वडील.आम्ही चार भावंड. मी सर्वात लहान.आमचे दादा एकदम कडक.कडक शिस्तीचे.दिसायला रूबाबदार. दादा येत आहे म्हटल्याबरोबर आम्ही पुस्तक धरून बसायचो. दादाची इंग्रजी पक्की.इंग्रजी लिखाण आणि  बोलणे यात ते एक्सपर्ट.इंग्रजी ग्रामर एकदम चांगले होते.खुप जुने इंग्रजी ग्रामरचे पुस्तक पण दादांकडे होते.दादा आम्हाला घरच्या घरी इंग्रजी शिकवायला बसत. दुसरीकडे आईचा स्वयंपाक सुरू असायचा.  सकाळी सकाळी माझा इंग्रजीचा अभ्यास घेत. अमरावती बोर्डातून दादा दहावी पास झाले. त्या काळात दादा शालांत परिक्षेत अमरावती बोर्डातून मेरीट मध्ये आले.ती मार्कशिट दादांकडे होती. दादांचे दहावीचे मार्क पाहून आम्हाला हेवा वाटायचा.गडचिरोली जिल्हयातील कोनसरी हे आईचे गाव.गावात जायला रस्ता नव्हता.लग्नाची वरात बसने कोनसरी येथे न्यायची होती.त्यासाठी जेष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते तथा जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक गजानन आक्केवार आणि  दादाने पुढाकार घेवून रस्ता तयार करण्यासाठी प्रयत्न केले.लग्नाच्या निमित्ताने कोनसरी येथे तयार झालेला तो पहिला मोठा रस्ता. श्री.गजानन आक्केवार म्हणजे  आमचे नाना. दादा आम्हाला आपल्या काळातील आठवणी सांगत. नातवांना विविध कथा,गोष्ट सांगून त्यांचे मनोरंजन करायचे. उन्हाळा लागला की,भाचे,भाच्या मूलच्या आईकडे जायचे आहे म्हणून माझ्या सोबत मूलला येत होते. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक असलेले दादा नंतरच्या काळात पंचायत समिती मध्ये भागशिक्षणाधिकारी झाले.मूल पंचायत समिती मध्ये ते जेष्ठ भागशिक्षणाधिकारी होते.मूल,सावली,पोभूर्णा,गोंडपिपरी,चंद्रपूर असा त्यांचा भागशिक्षणाधिकारी म्हणून प्रवास झाला.आमचे मुळ  गाव मूल . सोमनाथ रोडवर सादमवार यांच्या घरोसमोर मोठी जागा होती.त्या जागेत मातीची झोपडी होती.त्याठिकाणी विहिर अजूनही आहे. बदलीच्या निमित्ताने सतत एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जावे लागत होते. मात्र,नंतर आम्ही मूल मध्ये स्थायिक झालो. दादांना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा सहवास लाभला. महात्मा गांधीजी सोबत जवळून संबध त्यांचा आला नाही. परंतु,गांधीजींचे निष्ठावान सहकारी जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक वसंतराव आपटे गुरूजी, जानकीराम दंडेवार यांच्याशी त्यांचे जवळचे संबध होते.दलितमित्र,माजी खा.स्व.वि.तु.नागापूरे  वकील साहेब यांच्याशी दादांची जवळीकता होती.त्यामुळे दादांवर गांधी विचारांचा भारी पगडा होता.आजन्म त्यांनी खादी कापडाचा वापर केला. मूल येथील खादी भांडार मध्ये मी रोज जात होतो. आमचे दादा खादी भांडार मध्ये रोज बसायचे.स्वातंत्र्य संग्राम सैनिक जानकीराम दंडेवार हे त्यावेळेस खादी भांडार चालवायचे.भारतीय स्वातंत्र्य चळवळ,चले जाव आंदोलन आणि मूल मध्ये झालेली ऑगस्ट क्रांती यासर्वांचे वर्णन मी जानकीराम दंडेवार काकाजी कडून ऐकायचो.पुढे मी लोकमत,सकाळ मध्ये जानकीराम दंडेवार यांच्या विषयी,त्यांनी केलेल्या आंदोलना विषयी,त्यांचा असलेला प्रत्यक्ष सहभाग याविषयी लेख लिहलेले आहे. दादांनी जे आहे त्यात समाधान मानले. भागशिक्षणाधिकारी ( अर्थात शिक्षण विस्तार अधिकारी ) म्हणून मूल तालुक्यातील प्राथमिक शाळांना भेटी देत असताना त्यांनी पायदळ वारी करून शाळांना भेटी दिलेल्या आहेत. वेळेचे महत्व जोपासणारे होते.कोणतेही काम वेळेत झाले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असायचा. कामात प्रामाणिकपणा होता.शाळांना भेटी दयावे लागत असल्याने आईने मागे लागून  नंतर एक सायकल घ्यायला लावली. नंतरच्या काळात दादा सायकलने खेडे गावात जात होते. लिखाणाचे काम सुदधा  त्यावेळेस भरपूर होते.त्या कामात माझी मदत घेतली जात होती. केंद्र प्रमूख हे पद त्यावेळेस नव्हते.एका शिक्षण विस्तार अधिका-यांना संपूर्ण बीट सांभाळावे लागत होते. दादांचे खादी हेच जीवन होते.एक मुलगा पत्रकारिता करतो.याचा त्यांना आनंद होता. माझ्या लिखाणाबददल त्यांना उत्सुकता होती. माझ्या पत्रकारितेला आई वडीलांनी सदैव प्रोत्साहन दिले. आदर्श शिक्षक बाबूराव सोनूलवार,आदे गुरूजी,दंडेवार काकाजी हे दादांचे मित्र. भागशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांना त्यांच्या सेवा काळात उत्तम आणि उत्कृष्ट कार्या बददल अनेक पुरस्कार मिळाले.बॅग किंवा कापडी थैलीचा वापर न करता बोरा बिस्तारा बांधून दादा पंचवार्षिक निवडणूक कामामध्ये जात होते. आपण कसे दिसत आहोत,यापेक्षा  काम कसे  महत्वाचे आहे हा नियम त्यांनी पाळला. सर्वोदय आणि खादीला जपणारे दादांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आई वडीलांची प्रेरणा घेवून पुढे आमचे कार्य सुरू आहे. खादीचा प्रचार आणि प्रसार हा मुख्य भाग आहे. म्हणून मी सातत्याने खादी भांडार ,नाग विदर्भ चरखा संघाला भेटी देत राहतो.त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आई वडील आमच्यात नाही.पण,त्यांचे विचार आम्हाला सदैव प्रेरणा देतात. दादा शालांत परिक्षेत बोर्डात मेरीट आले.ती प्रेरणा घेवून मी माझ्या जनतेचा आवाज न्युज पोर्टल तर्फे शिंपी समाजातील दहावी बारावी तील गुणवंताचा आई वडीलांच्या  नावाने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतो. ज्या समाजामध्ये आपण राहतो,त्या समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजे. हे आमचे तत्व आहे. आज दादांचा सातवे पुण्यस्मरण. त्यानिमित्त संपूर्ण परिवारातर्फे विनम्र अभिवादन!!