नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करावा-अन्यथा जनआंदोलन उभारू
काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचा पालकमंञ्यांना इशारा
मूल : जिल्हयाच्या विविध भागात शेतकरी आणि ग्रामस्थांमध्यें दहशत पसरविणा-या नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी गुरे चराई क्षेत्र निर्माण करण्यात यावा, वन्यप्राण्यांचे वावर असलेल्या क्षेत्रात जाळीचे कुंपण करण्यांत यावे, वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि परिवाराला जाहीर केलेली सानुग्रह मदत 48 तासात पुरविण्यात यावी, वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी जंगलात निर्माण केलेल्या कृत्रीम तलावात पाण्याचा साठा मुबलक ठेवावा. अन्यथा वनविभागा विरूध्द जन आंदोलन करण्यांत येईल. असा इशारा काॅंग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्हयाच्या विविध भागात नागरीक नरभक्षक वाघांच्या दहशती मध्यें जीवन जगत आहेत. जंगलात निर्माण करण्यांत आलेल्या कृत्रीम तलावात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने तहान भागविण्या साठी वन्यप्राणी गावांकडे वळत असून वाघा शिवाय बिबट, अस्वल, हरीण आणि रानडुक्कर यांचे दिवसागणीक दर्शन होत आहे. त्यामूळे जीवाच्या काळजीपोटी शेतक-यांनी शेती कडे पाठ फिरवली असून जंगला लगतच्या अनेक गावांतील शेकडो हेक्टर शेती पडीत आहे. शेती पडीत ठेवलेल्या कुटूंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरे चारण्यासाठी चराई क्षेत्र आरक्षीत ठेवण्यात न आल्याने गुरे चारायची कोठे ? असाही प्रश्न नागरीकांसमोर निर्माण झाला असून वन्य प्राण्यांच्या भितीपोटी शेतक-यांचे गोधन दिवसेंदिवस कमी होत असल्याने देशाचा कणा असलेला शेतकरी संकटात सापडला आहे. अश्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकरी आणि नागरीकांना वनविभागाने मदतीचा हात दयावा. अशी विनंती संतोषसिंह रावत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हयाचे पालकमंत्री डाॅ. अशोक उईके यांना पाठविलेल्या निवेदनात संतोषसिंह रावत यांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य वनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगांवकर यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष चर्चेचा संदर्भ देतांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. येत्या काळात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पुन्हा जीवीत हानी होवू नये याकरीता पालकमंत्री या नात्याने वनविभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक आयोजीत करून ठोस उपाय योजना आखावी. अशी विनंती केली आहे. वन्य प्राण्यांचे हल्ले थांबावे म्हणून गांवालगतच्या जंगलात गस्त घालण्यासाठी वनकर्मचारी कमी पडत असल्यास बेरोजगारांना वनसेवक म्हणुन नियुक्त करून त्यांचे माध्यमातून गस्त वाढविण्यात यावी, गांवालगत असलेल्या जंगलात तारेचे कुंपण निर्माण करण्यात यावे, उन्हामूळे कोरडे पडलेल्या जंगलातील नैसर्गिक आणि कृत्रीम तलावात टॅंकर द्वारे पाणी सोडून वन्य प्राण्यांची तहान भागवावी. गुरे चारणा-या गुरांख्यांना टार्च आणि काठी उपलब्ध करून देण्यांत यावी, वनअधिकारी आणि वनकर्मचा-यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यांत यावी, आदि मागण्याही संतोषसिंह रावत यांनी केल्या असून सदर मागण्यांची पुर्तता न झाल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने काॅंग्रेस पक्ष जन आंदोलन उभारणार. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वनविभागाच्या मूल येथील विक्री केंद्रावर जळावु लाकुड उपलब्ध नसल्याने मागील महिण्याभरापासून मूल शहरातील नागरीकांना अंत्यसंस्कारा करीता चिचपल्ली किंवा सावली येथून लाकुड आणुन अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहे. ही घटना शहर विकासाची खिल्ली उडवणारी आहे. त्यामूळे मूल शहरात असलेल्या वनविभागाच्या जळावु लाकुड विक्री केंद्रावर पुरेश्या प्रमाणांत जळावु लाकुड उपलब्ध करून दयावे, अशी स्वतंत्र विनंतीही संतोषसिंह रावत यांनी केली आहे.