मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात दोन ठार
तालुका हादरला
भगवानपूर येथे महिला आणि कांतापेठ येथे पुरुषाचा बळी
मे महिण्यात सहा जणांचा मृत्यू
पहिली घटना
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
भगवानपूर येथील घटना
मूल:- जंगलात बांबूच्या बारीक काडया,सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर 524 मध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली.मृतक महिला चिरोली येथील रहिवासी असून संजिवनी संजय मॅकलवार वय 45 असे तिचे नाव आहे. मृतक महिलेसोबत तिचा पती संजय आणि टोलवाही येथील नातेवाईक कवडू बोमनवार,शांताबाई कवडू बोमनवार हे चार जण होते. चौघेही सकाळीच भगवानपूर येथील जंगलात गेले होते.बांबूच्या बारीक काडया,सरपण आणि कुडयाची फुले आणण्याचा त्यांचा उददेश होता. चिरोली,टोलेवाही पासून तीन चार किमी अंतरावर भगवानपूरचे वनविकास महामंडळाचे जंगल आहे. त्याठिकाणी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजिवनीवर हल्ला करून जागीच ठार केले.संजिवनीला फरफटत नेत असताना सोबत असलेल्या नातेवाईकांनी आणि पतीने आरडा ओरड करून वाघाला हुसकावून लावले. तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात संजिवनी गतप्राण झाली होती.ही घटना गावात माहित होताच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा मोका पंचनामा करून मृतदेह मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेेदनासाठी आणण्यात आला. या घटनेने चिरोली,टोलेवाही,भगवानपूर येथे खळबळ उडाली.परिसरातील शेतकर,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मूल तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यातील मे महिण्यातील ही पाचवी घटना आहे.चंद्रपूर जिल्हयातील 17 दिवसातील ही दहावी घटना आहे.वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे.खरीप हंगाम तोंडावर असताना वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे.
दुसरी घटना
वाघाच्या हल्ल्यात कांतापेट येथील सुरेश मुंगरु सोपानकार वय 52 वर्षे ठार झाला. सुरेश हा चिरोली मार्गावरच्या जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेलेला होता. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली. दुपारी बारा वाजताच्या सुमारास बकऱ्यांचा कळपच घरी वापस आल्याने गावकऱ्यांना संशय आला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. शोध कार्यामुळे सुरेश सोपानकार वाघाच्या हल्ल्यात बळी पडल्याचे लक्षात आले. वाघाने त्याचा एक पाय फस्त केल्याचे आढळून आले. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
दोन्ही घटनेतील नरभक्षक वाघ एकच असावा अशी शंका व्यक्त होत आहे. भगवानपूर आणि कांतापेठ ही दोन्ही घटनास्थळे थोड्या फार अंतरावर आहे.