वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार – चितेगाव येथील घटना – बंदोबस्त करण्याची मागणी

260

वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार
चितेगाव येथील घटना,बंदोबस्त करण्याची मागणी
मूल:- शेतातील भाजीपाला पीकाला  पाणी देण्यासाठी  गेलेल्या युवा शेतक-यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी घडली. मृत शेतक-याचे नाव शेषराज पांडूरंग नागोशे वय 38 वर्षे असे आहे. मूल तालुक्यातील वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी,शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. गुरूवारी चितेगाव येथे वाघाने एक गाय आणि एक गो-हयाला गावात येऊन ठार केले होते. त्यानंतर लगेच दुस-या दिवशी  चितेगाव येथे वाघाने शेतक-यावर शेतात हल्ला केला. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा अशी जोर धरत आहे. चितेगाव येथिल शेषराज पांडूरंग नागोशे यांनी उमा नदीच्या परिसरात असलेल्या आपल्या शेतात उन्हाळी भाजीपाला पीकाची लागवड केली आहे. या परिसरात  नदीकाठावरील ब-याच शेतक-यांनी डबल फसल  सुदधा लावली आहे. सकाळी शेतात पीकाची पाहणी करण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. शेतातील मोटार पंपाजवळच वाघाने हल्ला करून शेषराजला नदीकाठावरील परिसरात ओढत नेले. यावेळी शेषराजचे वडील सुदधा शेतावर होते.  ही घटना परिसरातील शेतक-यांना माहिती होताच त्यांनी गावात येवून गावक-यांना माहिती दिली.तसेच सावली, मूल वनविभागाला सुदधा कळविण्यात आले.या घटनेने चितेगाव येथे खळबळ उडाली आहे. शेषराव नागोशे यास आई वडील,पत्नी आणि  दोन मुली आहे. या घटनेने शेतकरी,शेतमजूर आणि गुराख्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे.वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.तालुक्यातील आकापूर,मरेगाव,एमआयडीसी परिसर आणि चितेगाव या भागात वाघाच्या हल्ले होत असल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. शेषराज हा आपल्या शेतातील भाजीपाला ठोक दराने विक्री सुदधा करीत होता. या घटनेने नागोशे कुटुंबीयांवर मोठा आघात बसला आहे. चिचपल्ली प्रादेशिक च्या वन परिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांनी वनविभागा तर्फे   नागोशे यांच्या कुटुंबीयांना पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत केली. मूल तालुक्यात मानव वन्यजीव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.