तीन जणांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद

118
तीन जणांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद
सुटकेचा निःश्वास ,पिल्लांसाठी शोधमोहिम सुरू

मूल:- तीन ते चार जणांचा बळी  घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद झाली.वनविभागाच्या पथकाला बुधवारी रात्री यश मिळाले. मरेगाव गावाजवळील उमा नदीच्या परिसरात बेशुदधीचे इंजेक्शन देवून अचूक निशाणा साधला.मरेगाव,आकापूर,चितेगाव आणि एमआयडीसी परिसरात या वाघीणीने धुमाकूळ घातला होता.शेतकरी वर्ग दहशतीमध्ये होता. वाघीणीच्या तीन पिल्लांना पकडण्यासाठी वनविभागाचे रेस्कू ऑपरेशन सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत पिल्ले पकडण्यात यश आले नव्हते. याप्रकरणी परिसरातील नागरिक,शेतक-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात मेंढपाळ निलेश दुर्गा कोरेवार, चितेगाव येथील युवा शेतकरी शेषराज पांडूरंग नागोशे आणि मेंढपाळ मल्लाजी येग्गावार यांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. पाच एप्रिल पासून वाघीणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने मोठी मोहीम आखली होती. उमा नदीच्या परिसरात शिकारी साठी आलेल्या वाघीणीला वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम नायगमकार यांनी अचूक निशाणा साधून बेशुदध केले. रेस्कू ऑपरेशन साठी वनविभागातील  70 कर्मचा-यांची चमू कार्यरत होती. वाघीण पिंज-यात जेरबंद असून तिचे तीन पिल्लांचा आता शोध घेण्यात येत आहे. अंदाजे एक वर्षाचे पिल्ले असल्याचे बोलल्या जाते. पिल्लांना पकडण्यासाठी साठी 50 कॅमेरे लावण्यात आले असून लाईव्ह कॅमेरे तीन आणि एक ड्रोन कॅमे-याची मदत घेतली जात आहे. वाघीणीने परिसरातील जनावरे आणि चार जणांना जखमी सुदधा केले होते. जेरबंद करण्यात आलेल्या वाघीणीला हलविण्याबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला नसल्याचे बोलल्या जाते. ज्या ठिकाणी वाघीणीला जेरबंद करण्यात आले त्या परिसरात कडक पहारा देण्यात आला आहे.  ही यशस्वीरित्या कारवाई चंद्रपूर येथील मुख्य वनसरंक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर,विभागीय वन अधिकारी प्रशंात खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.वनसरंक्षक विकास तरसे यांच्या नेतृत्वात सावली येथील वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे,वनरक्षक,क्षेत्रसहायक,कर्मचारी,पशुवैद्यकीय अधिकारी आणि शुटर यांनी यशस्वी कामगिरी केली. तीन पिल्लांना पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.वृत्त लिहिपर्यंत एकाही पिल्लास पकडण्यात यश आले नव्हते. या वाघीणीने मरेगाव,आकापूर,चितेगाव आणि एमआयडीसी परिसरात धुमाकूळ घातला होता.शेतकरी ,शेतमजूर दहशतीत होते.शेवटी वाघीण जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.